परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम असलेले अध्ययन केंद्र   

श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीयविद्या अध्ययन केंद्र, डॉ.मंजिरी भालेराव 

लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर महात्मा गांधींच्या सूचनेनुसार टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना दि. ६ मे १९२१ रोजी झाली. सुरुवातीला संस्कृत, समाजशास्त्र आणि आयुर्वेद या तीन विभागांच्या अधिष्ठानावरती उभे असलेले हे विद्यापीठाचे छोटेसे ज्ञानमंदिर नंतर एका मोठ्या ज्ञानसंकुलात रूपांतरित झाले. विद्यापीठातील एक महत्त्वाचा आणि सर्वात जुन्या विभागांपैकी एक असलेला विभाग म्हणजे आजचे श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीयविद्या अध्ययन केंद्र.
 
या विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे पाठशालेय पद्धतीने तसेच आधुनिक पद्धतीने अध्यापन केले जाते. पुण्यातील अतिशय मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेतील या शैक्षणिक संकुलात येथील अभ्यासक्रमांमध्ये वेद, व्याकरण, साहित्य, दर्शने इत्यादी महत्त्वाची शास्त्रे शिकवली जातात. भारतीयविद्या पारंगत, या नावाचा पण एम. ए. इंडोलॉजी या नावाने जास्त प्रसिद्ध असलेला, अभ्यासक्रमही या विभागामधून चालवला जातो. या विषयाच्या अभ्यासक्रमात प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती यांच्याशी संबंधित विषयांचा अंतर्भाव होतो. त्यामध्ये लेणी, मंदिरे, मूर्ती, ब्राह्मी लिपी, नाणकशास्त्र, उत्खनन आणि प्राचीन संस्कृतींचा अभ्यास शिकवणारे पुरातत्त्वशास्त्र, भारताबाहेरील भारतीय संस्कृतींचा प्रसार शिकवणारे बृहत्तर भारत असे अनेक विषय अंतर्भूत आहेत.
 
या वर्षीपासून विभागातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये खूप भर दिलेला भारतीय ज्ञानपरंपरा या विषयाची माहिती देणारा भारतीय ज्ञानप्रणाली पारंगत (M.­. in Indian Knowledge Systems) हा अभ्यासक्रम सुरु होत आहे. या अभ्यासानंतर केवळ आपल्या देशाच्या वैभवशाली वारशाचीच माहिती मिळेल असे नाही तर भारतभूमीतील प्राचीन आणि समृद्ध ज्ञान, कौशल्ये आणि जीवन पद्धतींचा वारसाही लक्षात येईल. 
 
सदाशिव पेठ इमारतीमध्ये जपानी भाषा विभागसुद्धा आहे. जपानी भाषा शिकवणार्‍या संपूर्ण भारतात ज्या संस्था आहेत, त्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विभागाचे स्थान खूप गौरवाने घेतले जाते. जपान सरकारकडून भारतामध्ये दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तींपैकी बराच मोठा भाग या विभागाला मिळतो. या अंतर्गत दरवर्षी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती घेऊन विद्यार्थी जपानमध्ये जाऊन अभ्यास करतात. या विभागाचे उत्तम यश पाहून जपान फाऊंडेशनने त्यांचा एक शैक्षणिक अधिकारी इथे कायमस्वरूपी नेमला आहे. या विभागातील अभ्यासक्रमामध्ये सौ. सुप्रिया फाटक यांच्याबरोबरीने पुण्यातील आणि जपानमधील अनेक भाषातज्ज्ञ त्यांचे योगदान देऊन जपानी भाषा शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे भाषाकौशल्य उत्तम प्रतीचे राहील याची काळजी घेत असतात. या विभागातील विद्यार्थ्यांना पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक प्रसिद्ध उद्योग-धंद्यांमध्ये विविध स्तरांवर नोकर्‍या मिळतात. अशा प्रकारे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक भाषाअभ्यास यांचा एक अनोखा संगम या ठिकाणी पाहायला मिळतो.
 
केवळ या विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच नाही तर पुणे शहरातील लोकांना आपला वारसा काय आहे हे समजण्यासाठी या विभागातर्फे विविध कार्यक्रम हाती घेतले जातात. १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिन, नारळी पौर्णिमेला संस्कृत दिन, वर्षभर विविध तज्ज्ञांची भारतीय संस्कृतीच्या अनेकविध अंगांची माहिती सांगणारी व्याख्याने इ. यापैकी काही महत्त्वाचे कार्यक्रम होत.याशिवाय यावर्षापासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, दैनिक केसरी आणि हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेकरांना आपला स्थानिक वारसा समजावा यासाठी नि:शुल्क अशा वारसा स्थळ भेटी (हेरिटेज वॉक) आयोजित केल्या जातात. या माध्यमातून पुण्यातील रहिवाशांना आपल्या परिसराची नव्याने ओळख होते आहे.    
 
या विभागातील प्राध्यापक डॉ. मंजिरी भालेराव, डॉ. अंबरीष खरे, डॉ. अकल्पिता सप्रे, डॉ. मनीषा पुराणिक हे विविध संशोधन प्रकल्पांचे काम करत करत आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत - 1) यादव राजांच्या शिलालेखांवरील प्रकल्प (डॉ. अंबरीष खरे - मुख्य संशोधक आणि डॉ. मंजिरी भालेराव- समन्वयक - खउकठ), 2) अष्टविनायक स्थळांचा इतिहास (डॉ. मंजिरी भालेराव - खउकठ), 3) भीमामाहात्म्य (डॉ. अंबरीष खरे - राष्ट्रीय संस्कृत संस्थान), 3) रामायण (डॉ. अंबरीष खरे - भक्तिवेदांत संशोधन केंद्र), 4) बालकथांचे संस्कृत भाषेत भाषांतर (डॉ. अंबरीष खरे आणि डॉ. अकल्पिता सप्रे - राष्ट्रीय संस्कृत संस्थान), 5) इंद्र महोत्सव (डॉ. मनीषा पुराणिक - श्रीमती विद्या बोकील पुरस्कृत प्रकल्प) इ. 
 
विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतीय ज्ञानपरंपरा या विषयासाठी संपूर्ण भारतातून ज्या प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले होते. त्यामध्ये डॉ. मनीषा पुराणिक यांची तीन स्तरांवरील प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. आता जे प्राध्यापक इतर महाविद्यालयात तेथील प्राध्यापकांना प्रशिक्षण देतील, त्यामध्ये डॉ. पुराणिक या तज्ज्ञ प्रशिक्षक या नात्याने सहभागी असतील. विभागातील प्राध्यापकांच्या कार्याची नोंद अनेक शैक्षणिक, सरकारी आणि सामाजिक संस्था घेत असतात आणि त्यांचा वेळोवेळी सन्मान करत असतात. 
 
मार्च 2025 मध्ये दर वर्षीप्रमाणे विभागाने ‘आचार्य वि. प्र. लिमये हे चर्चासत्र तसेच "Indian Culture in ­art  Literature' या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. विभागातील सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थी विविध महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवत असतात.श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीयविद्या अध्ययन केंद्र आणि जपानी भाषा विभाग हे आपल्या प्राचीन ज्ञान आणि मूल्यांचा आदर करतात; पण त्याचबरोबर आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विकास आणि प्रगती साधतात. तो नवीन कल्पनांना प्रोत्साहन देतात; पण आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहतात. हे सगळे करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि पदाधिकारी नेहमी प्रोत्साहन देत आले आहेत. 

Related Articles